Monday, 2 April 2018

राजकारण

*राजकारण करायचे असल्यास युवा नेते बनण्यापूर्वी निदान स्वतःच्या दोन वेळच्या भाकरीची तजवीज करून ठेवा...*

व्याजाने पैसे आणून कितीही मोठ मोठाले होर्डिंग्ज लावले तरी घरी कुणीही धान्य आणून देत नसतं...

तुमची उपयुक्तता संपली की तुम्हाला तुमचे आदर्श नेते खरूज लागलेल्या कुत्र्याप्रमाणे फाटकाबाहेर हाकलून देतील...

तुम्ही हातात मोठ्या अभिमानाने मिरविलेले पिवळे भगवे, निळे आणि हिरवे झेंडे तुमच्या अवस्थेवर खो खो हसतील...

नोकरी किंवा व्यवसाय नसलेल्या तरुणांचा भविष्यकाळ अत्यंत बिकट असणार आहे...

जे लोक तुम्हाला करियर डेव्हलपमेंटच्या गोष्टी सांगतात, ते स्वतःच कुणाची तरी भाड खाऊन कुटुंबनिर्वाह करतात...
कुणी आपला स्वाभिमान विकलेला आहे, कुणी कळलाव्या नारदाची भूमिका बजावत आहे, अशा वाममार्गानेच तुमचे आवडते नेते पैशांनी गब्बर झालेले आहेत व येथून पुढे राजकारण हे त्यांच्याच अवती भवतीच फिरणार आहे...

पक्ष, पक्ष- संस्कार, पक्षाची विचारधारा या निव्वळ पोकळ गप्पा असून या भाकडकथा तुमच्या माझ्यासारख्या तरुणांना फुकटात राबवून घेण्यासाठीच रचलेल्या आहेत...

जेवढा वेळ आपण नेत्यांच्या मागे धावण्यात वाया घालवितो, तेवढ्या वेळात एखाद्या कपड्याच्या दुकानात काम करून महिन्याकाठी ५ ते १० हजार रुपये कमवून आपण आपल्या आई वडिलांच्या हाती देऊ शकत असू, तर या जगात आपल्यापेक्षा मोठा विकासपुरुष अन्य कुणीही असू शकत नाही...

आपल्या एकामुळे जगाचे काहीही बरे-वाईट होत नाही. आपण स्वतःचा विकास केल्यास राष्ट्राचा विकास आपोआप होतो. ५० लाखांच्या गाडीत हिंडणाऱ्या व्यक्तीस गरीबाशी, बेरोजगाराशी काहीही देण घेण नसतं, तो फक्त आपला स्वार्थ जपत असतो. त्यामुळे आपली घरची परिस्थिती बेताची असल्यास नेत्यांच्या अजिबात मागे लागू नका...

आपल्याला पुढे आर्थिक चणचण, शुगर, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, राजकारणाच्या नादी लागून फुकटचे विकत घेतलेले शत्रुत्व व बेरोजगारी अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे, जेव्हा तुमचे आवडते नेते तुम्हाला १ रुपयाची सुद्धा मदत करणार नाही...

तुमचं तारुण्य निघून गेल्यावर कुणीही तुम्हाला दारू पाजणार नाही किंवा मटन खाऊ घालणार नाही, कारण तुमचा उपयोग संपल्यावर अन्य कुणी तरी दुसरा मूर्ख तरुण रिक्रुटमेंटसाठी कायम नेत्यांपुढे तयार असेलच. मग चोरी, गुन्हेगारी किंवा आत्महत्या या तीन पर्यायांखेरीज अन्य कुठचाही पर्याय तुमच्याजवळ शिल्लक नसेल...

स्वतःला सावरून आयुष्य संपन्न बनविण्याचे हेच वय असते. हे वय नेत्यांच्या मागे धावण्यात वाया घालवू नका...

No comments:

Post a Comment